गोवर प्रतिबंधक लसीपासून एकही बालक वंचित राहू नये- जिल्हाधिकारी संतोष पाटील 

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 28): –

 सातारा जिल्ह्यात एकूण 41 आश्रम शाळा आहेत. या शाळेतील एकही विद्यार्थी गोवर आजाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाची मोहिम 15 ते 30 सप्टेंबर कालावधीत राबविण्यात यावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 41आश्रम शाळेत 5 हजार 68 विद्यार्थी आहेत. यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी लसीकरण देण्याबाबत वेळापत्रक तयार करावे. या वेळापत्रकानुसार आश्रम शाळांना कळविण्यात यावे. ज्या आश्रम शाळेत जास्त बालके आहेत त्या आश्रम शाळेत पहिल्यांदा लसीरकणाची मोहिम राबवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

नागरिकांना आरोग्य सुविधा चांगल्या व जलदगतीने मिळाव्यात यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे आष्युमान भारत कार्ड काढुन त्यांना त्वरीत वाटप करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  शिबीर आयोजित करुन येत्या 10 दिवसात उद्दिष्ट पूर्ण करावे. या कामासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची मदत घ्यावी. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचेही आरोग्य मित्रांकडून आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!