
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ०२ मार्च २०२६):- संवाद साधण्याचे प्रमुख साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. संवाद साधताना आपण आपल्या मातृभाषेतून साधावा. मराठी भाषा ही अभिजात भाषा असून महाराष्ट्रात सुसंवाद साधण्याची एक प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेची व्याप्ती वाढली तर सुसंवाद वाढेल. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात त्या बोलीभाषा स्थानिक भाषा विकसित झाल्याशिवाय मराठी भाषा विकसित होणार नाही.

मराठी भाषेवर कितीही भाषांची आक्रमण झाले तरी मराठी भाषा इच्छा अस्तित्व कोणीही पुसू शकत नाही. त्यासाठी नवी पिढी तयार होत आहे. मराठी भाषेतील साहित्य हे जगातील वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित झाले तर हे साहित्य जगभर पोहोचेल त्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा अधिक उंचवून मराठीचा सन्मान होईल. मराठीचा सन्मान करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे त्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे काळाची गरज आहे. साहित्यिकाबरोबर मराठी भाषेकांनी सजग राहून मराठीची व्याप्ती वाढवली पाहिजे व मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त वापर करून मराठीचा दर्जा उंचावला पाहिजे. ही जबाबदारी ही एकट्या कोणाची नसून ती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे आहे याचे भान सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. साहित्यिकांनी आपले साहित्य हे अधिक दर्जेदार कसे होईल व ते कसे वाचणे होईल त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषा संपणारही नाही आणि कोणी संपवू शकणार नाही.

फलटणचा साहित्यिक संवाद हा मराठी भाषा वृद्धीसाठी प्रयत्न करत असून साहित्यिकांना बळ देण्याचे काम करत आहे. फलटणचा साहित्यिक संवाद हा प्रसार माध्यमाद्वारे सर्व दूर पसरला आहे त्यामुळेच त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषेसाठी व साहित्यिकांच्या लेखणीला व विचाराला बळ मिळावे म्हणून अखंडपणे तीन वर्ष सुरू असलेला हा साहित्यिक संवाद फलटण साठी अभिमानाची बाब आहे असा सूर फलटण येथील नाना नानी पार्क येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण वन विभाग फलटण यांच्यावतीने आयोजित केलेला मराठी भाषा गौरव दिन व 36 वा साहित्यिक संवाद या कार्यक्रमात उमटला. यावेळी मुख्य सयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक करून मराठी भाषेची आजची स्थिती आणि साहित्यिकांचे योगदान तसेच वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये घडणाऱ्या व बिघडणाऱ्या बाबीवर प्रकाश झोत टाकला.

यावेळी साहित्यप्रेमी रवींद्र येवले विक्रम आपटे सुरेश भगत विनायक ननावरे सुधीर इंगळे आशा दळवी विजया सुरवसे सुरेश शिंदे राजाभाऊ काकडे अशोक शिंदे संगीता वाघमारे विकास शिंदे राजाभाऊ काकडे शुभांगी पुजारी भारतीय जगदाळे रोहिणी भंडलकर हरिभाऊ जाधव बबनराव जाधव आप्पासाहेब तांबे करिष्मा मुलाने नरेंद्र वाघमारे सचिन भांडवलकर अमोल जाधव विक्रम भांडवलकर श्रेयस कांबळे यांचा फलटण तालुका साहित्य प्रेमी सन्मानपत्र व एक पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य रवींद्र येवले रोहिणी भंडलकर विक्रम आपटे सुधीर इंगळे आशा दळवी करिष्मा मुलाने विनायक ननवरे विजया सुरवसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक संवादाचे मुख्य संयोजक ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार श्रेयस कांबळे यांनी मानले.


