
फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे, दि २८ मार्च २०२६): – राज्यातील हवामानात सध्या लक्षणीय बदल दिसून येत असून येत्या 30 आणि 31 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः दुपारनंतर आभाळ दाटून येत हलका ते अतिदमदार स्वरूपाचा पाऊस, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता असून, शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
30 मार्च
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे आणि ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये या बदलाचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. 30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून विजांचा कडकडाटही होऊ शकतो.
31 मार्च
31 मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या अस्थिर हवामानाचा परिणाम कायम राहण्याचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी सतर्क राहावे
दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सध्या सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, तसेच झाकण्यासाठी ताडपत्री किंवा इतर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तसेच वादळी वाऱ्यांपासून आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही दिवस हवामानाचा अद्ययावत अंदाज नियमितपणे तपासून शेतीची कामे नियोजनबद्ध करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. एकूणच, राज्यातील हवामान पुढील दोन दिवस अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

