राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा

फलटण टुडे (सातारा दि. 13 ): 
जिल्हा वार्षिक योजनेमधील नावीण्यपूर्ण योजनेतून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे घेण्याबरोबर शाश्वत शासनाची मालमत्ता तयार होण्यासाठी भर द्यावा. तसेच या योजनेत बदल करण्यात येणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या दालतनात जिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी श्री. क्षीरसागर बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.

महाबळेश्वर, पाचगणी व कास पठार पर्यटनाच्या दृष्टीने निधीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत, त्याची माहिती द्यावी म्हणजे त्या निधीबाबत पाठपुरावा केला जाईल, असे सांगून नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. क्षीरसागर म्हणाले, वासोटा येथे महाराष्ट्रातून ट्रेकींगसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात तेथे त्यांच्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावे.

नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. यामध्ये ग्रामपंचायतींमधील सांडपाणी व्यवस्थापनापासून काम करावे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त गरजुंना लाभ द्यावा, असेही श्री. क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!