बारामती: विद्यार्थीदशेतच संशोधन वृत्ती जोपासा: डॉ भरत शिंदे विद्यार्थीदशेतच संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी २००६ सालापासून दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्यस्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे. संशोधन हे सामाजिक संचित असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. येथील विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील ‘अविष्कार- २०२२’ संशोधन प्रकल्प स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयात नुकतेच विद्यार्थ्यांसाठी ‘महाविद्यालयीन स्तरावर ‘आविष्कार- २०२२’ या ‘संशोधन प्रकल्प स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ. जयश्री बागवडे, प्रा. डी. के. जगताप, डॉ. राहुल तोडमल उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अशा संशोधन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कडे असणारी नाविन्यपूर्ण संशोधन वृत्ती जोपासावी आणि समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या संशोधनाला प्राधान्य द्यावे असे आवाहन प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत एकूण ६९ प्रकल्पांचे पोस्टर आणि प्रतिकृतीमार्फत उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले. डॉ. कार्तिकेयन, प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ, डॉ. तुषार बोरसे, प्रा.अनिल डिसले, डॉ. प्रसाद महाजन, प्रा. सुजाता पाटील यांनी विविध प्रकल्पांचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी यामध्ये मूलभूत विज्ञान, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, नॅनोतंत्रज्ञान, ऊर्जा, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण वाणिज्य व व्यापार, व्यवस्थापन इ. विषयांवर आधारित प्रकल्प सादर केले. डॉ. जयश्री बागवडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‘अविष्कार ‘ स्पर्धेची माहिती दिली. डॉ. राजेश शर्मा यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. मान्यवरांनी प्रकल्पांची पाहणी केली. आभार डॉ. कल्पना चंद्रमोरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.अमरजा भोसले यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर सेवकांचे विशेष सहकार्य ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी लाभले.


