मुंबई, दि. १५ :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली.
मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. दुर्घटनेतील मृत बांधवांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहेत. अपघातातील जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.