नांदगिरी सातारारोड येथील कल्याणगड हा एक गड किल्ला

विशेष लेख 10

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी सातारारोड येथील कल्याणगड हा एक  गड किल्ला असून कल्याणगडावर असणारे वैशिष्ट्यपूर्ण  जलमंदिर मात्र स्मृतिपटलावर कायमचे कोरले जाण्यासारखे आहे. कल्याणगड यानिमित्ताने…. 
नांदगिरी ता. कोरेगाव येथील कल्याणगड हा ३५०० फूट उंचीचा गड किल्ला असून गिरीदुर्ग प्रकारातील हा गड किल्ला चढण्यासाठी सोपा आहे. कोरेगाव सातारारोड येथील कल्याणगड हा किल्ला व जवळच नांदगिरी, किन्हई गाव व डोंगर आहे. 
पुणे – बंगळूर राष्ट्रीय रस्त्यावर सातारा शहर वसलेले असून शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव शृंग रांग आलेली आहे. शृंगात नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभा राहिलेला असून पुणे ते सातारा रस्ता पूर्वेला कल्याणगड हा गड किल्ला आहे.
सपाट माथा असलेल्या कल्याणगड  किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरून ओळखला जातो.
सातारा शहरापासून सातारारोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असून महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बस सोय उपलब्ध आहे. पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येथे येता येते. सातारारोड रेल्वेस्थानकावर उतरुन गडावर जाता येते. चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगड पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर 3 किलोमीटर आहे.
कल्याण गडावर पाहण्यासारखी ठिकाणे असून
कल्याणगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारी पायवाट आहे. पायथ्याला धुमाळवाडी हे गाव आहे. गावाला नांदगिरी असे ओळखले जाते. नांदगिरीमधून गडावर जाणार्‍या पायवाटेच्या प्रारंभी काही नव्याने बांधलेल्या पायर्‍या आहेत. पायर्‍या संपल्यानंतर मुरमाड वाट असून या वाटेने गड चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो.  दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजागी रंगवलेले असल्यामुळे रस्ता भरकटला जात नाही. दांडावर आल्यानंतर अर्ध्या डोंगरात एक कोरलेली गुहा असून आत 5/6 दगडी खांब आहेत. सध्या पाणी भरलेले आहे.  पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. खांबांना धरुनच वाट गडावर पोहोचते. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा असून दरवाजाच्या खालच्या पायर्‍यांच्या दुरुस्तीचे काम सध्या चालू होते ते पूर्णत्वास जात आहे. दरवाजामध्ये गावकर्‍यांनी लोखंडी जाळी बसवलेली असून किल्ल्याला भेट देणार्‍या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने येथे येत असतात.
कल्याणगडाचे  वेगळेपण इथे दडलेले असून दरवाजातून आत शिरताच समोर कातळकडा आहे. कातळकड्याच्या डावीकडे खाली काही पायर्‍या उतरल्यावर एक गुहा असून या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे आवश्यक आहे. कड्यातील गुहेचे तोंड आहे याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची  पाच ते सात पोळी लटकलेली दिसतात. कांदा – लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असून गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. बॅटरीच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आत जावे लागते. आत मार्गदर्शक अशा सळया रेलिंगसारख्या लावलेल्या असून पहिले दहा पंधरा फूट गुहेची उंची कमी असल्यामुळे वाकून आत जावे लागते.  उंची वाढल्यामुळे उभे राहून जाता येते. या मार्गावर कधी पाणी गुडघ्याएवढे असते तर कधी कमरे एवढे असते. सध्या गुहेतील वाट बांधून काढण्याचे काम गावकर्‍यांनी सुरू केलेले आहे. ते पूर्णही होत आले आहे. तीस पस्तीस फूट आत गेल्यावर नवव्या शतकातील एक पार्श्वनाथाची मूर्ती आहे. बाजूलाच दत्ताचे छोटेखानी मंदिर असून शेजारीच सध्या देवी मूर्तीही विराजमान झालेली आहे. हा सगळा भाग अंधार असल्यामुळे बॅटरीच्या उजेडातच पहावा लागतो. गोंगाट न करताच गुहेपासून दूर जावे लागते. पुन्हा दरवाजाच्याकडे येवून येथून वरच्या दरवाजाकडे जाणारी वाट धरावी लागते.
वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. दरवाजाच्या आत गेल्यावर समोर हनुमानाचे मंदिर आहे. शिखरावर गणपतीची मूर्ती बसवलेली असून मंदिराच्या डावीकडे कड्यावर एक गोलाकार पर्णकुटी उभारली आहे. 
कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून आटोपशीर आहे. माथ्यावरील एका वास्तूचे नूतनीकरण करून भक्त मंडळीसाठी निवासस्थान उभारलेले आहे. या वास्तूसमोरच एक समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलेले असून माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहे. मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. झाडाखाली कबर आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या टोकावरून समोरच जरंडेश्वराचा डोंगर दिसतो. सातारा शहर आणि अजिंक्यतारा किल्ला व यवतेश्वरही दृष्टिपथात येतो. पूर्वेकडे किन्ही गावातील यमाई देवीचा डोंगर,  एकांबेचा डोंगर दिसतो. त्यामागे भाडळीकुंडल रांगेतील वर्धनगडही दृष्टीस पडतो. संपूर्ण गड पाहण्यास तासभर पुरतो. गड पाहून, पुन्हा आलेल्या मार्गाने गड उतरावा लागतो. कल्याणगडावर वैशिष्ट्यपूर्ण असे जलमंदिर मात्र स्मृतिपटलावर कायमचे कोरले जाण्यासारखे आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!