बारामतीत संपन्न झाला २६ वा एज्युकेटर कॉन्क्लेव्ह

एज्युकेटर कॉन्क्लेव्ह प्रसंगी ज्ञानेश्वर मुटूकळे, शेषराव काळे, डॉ नितीन कदम व इतर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि.०३):-

एक शिक्षक त्याच्या कारकिर्दीत किमान ६००० विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देत असतो. त्यामुळेच नजिकच्या भविष्यात शिक्षण क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांकडे शिक्षकांनी गांभिर्यपुर्वक पाहून त्यानूसार स्वत:मध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हरसिटीचे उपकुलगुरू प्रा. नितीनकुमार यांनी केले.
बारामती येथे खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालक, अधिकारी आणि शिक्षकांसमोर बोलत होते.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने बारामती येथे २६ व्या एलपीयू एज्युकेटर कॉन्क्लेव्ह २०२५ चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शहरातील ३५ हून अधिक शिक्षक, कोचिंग क्लास संचालक , व्यवस्थापक सहभागी झाले होते. शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर चर्चा करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता.

१७२९ आचार्य अॅकॅडमीचे ज्ञानेश्वर मुटकूळे, दिशा अॅकॅडमीचे डॉ. नितीन कदम आणि क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे प्रा. शेषराव काळे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षण संस्थेचा संचालकाने पालकाच्या भुमिकेतून पहायला शिकले पाहिजे, आपल्या वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्याला आपण काय देऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे असल्याचे यावेळी डॉ. नितीन कदम यांनी सांगितले. देशभरात पारंपारिक शिक्षणसंस्थांपलिकडे खासगी क्षेत्रातील विद्यापीठेही चांगली कामगिरी करत आहेत. याबाबत माहिती घेऊन आपण आपल्या विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोचविली पाहिजे असे क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे शेषराव काळे यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारची संमेलने नियमितपणे होणे गरजेचे असल्याचे १७२९ आचार्य अॅकॅडमीचे ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी सांगितले.

एलपीयूचे क्षेत्रीय प्रमुख हेमंत विज यांनी यावेळी एलपीयू शिक्षक सन्मान अनुदान शिष्यवृत्तीबाबत घोषणा केली. या उपक्रमांतर्गत, शिक्षकांच्या मुलांना एलपीयूमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल, जेणेकरून ते त्यांचे करिअर नवीन उंचीवर नेऊ शकतील. वरीष्ठ अधिकारी अशोक कारंडे यांनी यावेळी एलपीयूबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान, शिक्षक, मुख्याध्यापक आणि कोचिंग संस्थांच्या संचालकांनी त्यांचे अनुभव सांगितले. शिक्षण क्षेत्रात येणारी नवीन आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर त्यांनी चर्चा केली.
या कार्यक्रमाने शिक्षणतज्ज्ञांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, जिथे त्यांनी शिक्षणातील नावीन्य, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आणि शिक्षकांची भूमिका यावर विवेचन केले.
या कार्यक्रमात सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप मिश्रा आणि वरिष्ठ अधिकारी बद्री फाळके यांनी विशेष सहभाग घेतला.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!