अतिवृष्टीमुळे श्रीमंत संजीवराजे यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा पुढे ढकलला: मा आमदार दीपक चव्हाण

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २८ सप्टेंबर २०२५ ):-
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची गुरूवार ९ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी होणारी एकसष्ठी निमित्तचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्रात होत असणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने स्थगित करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी संजीवराजे यांच्या एकसष्ठी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राज्यातील मराठवाड्या सह पश्चिम
महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून अतिवृष्टी सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे. जवळपास 22 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली.

अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून संसार उघड्यावर पडला आहे तर काही घरे वाहून अन्न धान्याचे नुकसान झाले आहे ,पशुधन वाहून गेल्याने मोठी हानी झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण घेतले तर दहा हजार पेक्षा जास्त कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यावरच मोठे संकट कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. माणुसकीची जाणीव ठेवून कुठेतरी आपल्याकडून पावसाने बाधित झालेल्या कुटुंबांना मदत झाली पाहिजे.शासन मदत करेलच मात्र फलटणचे राजघराणे अशा प्रसंगाच्या वेळी जिल्हा किंवा जिल्ह्याच्या बाहेर मदत करत असते. यापूर्वी ही सांगली जिल्ह्याला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळीही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मदत देण्यात आल्याचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्र खो – खो असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस काही दिवसांसाठी स्थगित करून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येणारअसून धान्य, चारा, कपडे, ब्लँकेट अशा वस्तू तालुक्यातील जनतेने पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणेचे आवाहन माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी केले

यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, शंकरराव माडकर, बापूराव गावडे, जयकुमार इंगळे, दादासाहेब चोरमले आदि मान्यवर उपस्थित होते.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!