राजघराण्याचा मान-सन्मान व्हावा, शिवसैनिकांची मागणी

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ एप्रिल २०२६):-
पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांना संधी देऊन त्यांच्या राजकीय कार्याचा मान-सन्मान राखावा, अशी भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे राजघराण्यातील प्रभावी व्यक्तिमत्व असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांनी दीर्घकाळ तळागाळात काम करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी बांधिलकी ठेवली आहे. सामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असे मत शिवसैनिक मांडत आहेत. त्यामुळे शिवसेनेला मिळणाऱ्या जागेसाठी सातारासह पश्चिम महाराष्ट्रातून त्यांच्याच नावाचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २३ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ३० एप्रिल ही अंतिम तारीख आहे. २ मे रोजी अर्जांची छानणी होईल, तर ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. संबंधित ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार ९ पैकी सुमारे ५ जागा भाजप, २ जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, १ जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून १ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना द्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत असून पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



