रोटरी क्लब ऑफ फलटण तालुका यांच्यावतीने श्री जितोबा विद्यालयास संगणक भेट.

वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, प्लॅस्टिक निर्मूलन, वैज्ञानिक जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन.

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ ऑगस्ट २०२६):- रोटरी क्लब ऑफ फलटण तालुका यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय, जिंती, ता. फलटण, जि. सातारा या विद्यालयास संगणक संच भेट देण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, वैज्ञानिक जाणीव जागृती व प्लॅस्टिक निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी डॉ. महेश बर्वे, राजेंद्र रणवरे,प्रकाश रणवरे,महादेव रणवरे,नवनाथ रणवरे.चंद्रकांत रणवरे,शरदराव रणवरे, विनायकराव रणवरे,शरदसर रणवरे, जगदेवराव रणवरे, माधुरी जाधव, ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लब ऑफ फलटणचे संस्थापक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार एआय शिक्षणाची गरज ओळखून एक संगणक संच भेट देण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरासाठी डॉ. अंकिता गांधी (बालरोगतज्ज्ञ) व डॉ. सई खराडे (बालरोगतज्ज्ञ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.प्लास्टिक निर्मूलन जनजागृती
कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रो. महेश बर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक निर्मूलन, पर्यावरण संवर्धन व प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांना प्लास्टिक निर्मूलनाची शपथ देण्यात आली.वैज्ञानिक जाणीव जागृती व अंधश्रद्धा निर्मूलन
रोटरी क्लबचे सचिव सुधीर इंगळे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने विविध वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक विचारसरणीचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता, पर्यावरण संवर्धनाची भावना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धेविरोधात विवेकपूर्ण विचारसरणी निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले, सूत्रसंचालन अंकुश सोळंकी यांनी केले तर आभार अमोल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ रणवरे, प्रणव रणवरे व रणजित रणवरे व विद्यालयातील शिक्षक यांनी सहकार्य केले. तसेच विद्यालयाचे शिक्षक,विद्यार्थी, जिंती गावातील ग्रामस्थ,रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य,माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!