मंडळाची १२ वीची परीक्षा उद्यापासून.
सीसीटीव्हीच्या निगराणीखाली खरी ‘कसोटी!’

फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर ०९ फेब्रुवारी ३०२६):- कोल्हापूर विभागातील १,१६,६२६ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेचा प्रारंभ उद्या, मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ पासून होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाने यंदा ही परीक्षा केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया न ठेवता, तिला ‘यशाचा राजमार्ग’ बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेले हे सूत्रबद्ध नियोजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाची खात्री देणारे ठरत आहे.

यंदाची परीक्षा प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यात आली आहे. स्कूल प्रोफाईल मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आली. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, ही मंडळाची प्राथमिक भूमिका होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोच्च मानून ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्याची विशेष मुभा देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी वेळापत्रकाची पुनर्रचना करण्यात आली आहे. महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये पुरेसा खंड (सुटी) देऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. मंडळाने बजावले आहे की, केवळ अधिकृत छापील वेळापत्रकच ग्राह्य धरावे, जेणेकरून कोणत्याही संभ्रमाला जागा राहणार नाही.
परीक्षेच्या काळात नकारात्मक विचारांचा वारा शिरू नये, यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने समुपदेशकांची एक मोठी फौज उभी केली आहे. राज्य मंडळ पुणे आणि स्थानिक स्तरावरील हे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करतील. तसेच, विभागीय मंडळाच्या नियंत्रण कक्षात खालील हेल्पलाइन क्रमांक कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील:
०२३१-२६९६१०१
०२३१-२६९६१०२
०२३१-२६९६१०३
राज्य शासन आणि मंडळाच्या कडक निर्देशानुसार, २० ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान ‘कॉपीमुक्त’ जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. हा केवळ उपक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची बीजे पेरण्याचा प्रयत्न होता. वर्षभर राजमार्ग पुस्तके द्वारे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे नियोजन देण्यात आले होते तसेच विशेष उपक्रम घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. शिवाय, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत

संवेदनशील केंद्रांवर जिल्हा समितीच्या द्वारे ड्रोन कॅमेरा मधून निगराणी ठेवली जाईल.
संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात कैद केली जाईल.
केंद्राच्या ५०० मीटर परिसरात जमावबंदी असेल आणि झेरॉक्स सेंटर्सना टाळे लागतील. जमावबंदीसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांसाठी ‘स्पेशल स्क्वॉड’
विभागातील एकूण ११ केंद्रे (सातारा-०३, सांगली-०४, कोल्हापूर-०४) अशी आहेत जिथे प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही नाहीत. अशा ठिकाणी पारदर्शकता राखण्यासाठी त्या शाळांमधील कर्मचारी न घेता, इतर शाळांमधील केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आंतरविभागीय समन्वय साधण्यात आला आहे.ग्रामीण भागातील मुलांसाठी वेळेवर गाड्या सोडण्याचे आदेश दिले आहे.अखंडित वीजपुरवठा राखण्याची जबाबदारी वीज कंपनीवर सोपवण्यात आली आहे.
पेपर लिहिण्यासाठी निर्धारित वेळेनंतर १० मिनिटांची वाढीव वेळ यंदाही कायम आहे.

१६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगांना लेखनिक आणि वाढीव वेळेचा आधार दिला जाणार आहे.
कडक शिस्त आणि भरारी पथके
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ‘दक्षता समिती’ आणि मंडळाची ‘भरारी पथके’ अचानक भेटी देणार आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही केंद्रांना भेटी देण्याची विनंती करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिसेस ॲक्ट १९८२’ अंतर्गत गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
‘आउट ऑफ टर्न’ आणि अंतर्गत मूल्यमापन
काही अपरिहार्य कारणांमुळे ज्यांची श्रेणी, तोंडी परीक्षा किंवा प्रकल्प परीक्षा हुकली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी १२ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत ‘आउट ऑफ टर्न’ परीक्षेची विशेष तरतूद केली आहे. प्रात्यक्षिक आणि अंतर्गत गुणांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
वेळेचे बंधन आणि प्रवेशपत्राचे महत्त्व
विद्यार्थ्यांनी सकाळी १०:३० आणि दुपारी २:३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. हॉलतिकीटावर दिलेल्या विषयांच्या तारखा आणि वेळेचे काळजीपूर्वक वाचन करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.
“कोल्हापूर विभागातील प्रत्येक शाळेसाठी ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ आखून दिला आहे. कडक शिस्तीचा आमचा हा हेतू केवळ विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आहे. शैक्षणिक कामकाजासोबतच आम्ही विद्यार्थ्यांच्या मनाचाही विचार केला आहे!” — राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ.

