फलटण – केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदी धोरणाच्या निषेधार्थ कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या फलटण तालुका शाखेच्यावतीने फलटण चे तहसीलदार आर. सी.पाटील यांना निवेदन देण्यात आले असून निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी एकमुखी मागणी या तरुणांनी केंद्र सरकारकडे केली आहे.दरम्यान या ना कारणाने नेहमीच शेतकरी अडचणीत येत असताना केंद्राने केलेली निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून ती मागे घेण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेच्या फलटण तालुका युवती अध्यक्षा जिजाई संजय फडतरे, सातारा विद्यार्थिनी सेल युवती उपजिल्हाध्यक्षा नेहा रोहिदास थोरात, तसेच फलटणचे सक्रिय सदस्य सौरभ बागल, गणेश सस्ते, पवन आवळे, विकास शिंदे, प्रफुल्ल पोतदार उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे, की शेतकरी हा देशाचा तारणहार असून,सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत असताना कांदा निर्यात बंदीचा केंद्राचा निर्णय अन्यायकारक असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सध्या कांद्याला चांगला भाव मिळणार असल्यामुळे शेतकरी आनंदित होते. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे दर पुन्हा पडणार आहेत. व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येणार असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा तथा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे.असे या निवेदनात म्हटले आहे.