जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी गृह विलगीकरणाचे नियम कडकपणे पाळावेत – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

 

सातारा दि. 22 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी गृह विलगीकरणात प्रशासनाने घालून दिलेले नियम कडकपणे पाळावेत, त्यांच्या नियम तोडण्याने, जवळचे नातेवाईक, गावातील नागरिक बाधित होवू शकतात. त्यामुळे त्यांनी गाव आणि जिल्ह्याचे हित लक्षात घेवून गृह विलगीकरण कडकपणे पाळावे. गाव समितीने यावर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थिती आणि कोरोना संदर्भात आढावा घेतला. त्यावेळी गृहराज्य मंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे  उपस्थित होते.

             ज्या शाळांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्या शाळा अतिवृष्टीत असुरक्षित असतील तर त्याची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच बाहेरुन आलेल्यांना त्यांच्या राहत्या घरी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. ते नागरिक कडकपणे विलगीकरण पाळतील यासाठी गाव समित्यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी योवळी दिले.

            पाटण आणि कराड तालुक्यात अतिवृष्टीच्या काळात पुराचा धोका असतो. हे ओळखून प्रशासनाने पावसाळयापूर्वीच एनडीआरएफ टिमचे नियोजन केले असून पाटण आणि कराडसाठी बोटी वितरित केल्या असून पूरपरिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही एनडीआरएफ कडून दिले जाईल असे  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!