उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रथ यात्रेचा शुभारंभ करताना व सोबत मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २० जुलै २०२६ ):-
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), बारामती आयोजित तिसऱ्या वर्षीच्या श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सवाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या व भगवान श्रीजगन्नाथांचे आशीर्वाद सर्वांना लाभावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.
गदिमा सभागृह व पेन्सिल चौक येथून रथयात्रेला प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, भरत गावडे पाटील, अभिजीत जाधव, रंजना तांबे, डॉ. रत्ना खरात, निर्मला भोईटे काकी, डॉ. सुनीता शहा नगरसेवक अमोल कावळे, अल्ताफ सय्यद, नवनाथ बल्लाळ, श्रीमान नंददुलाल प्रभुजी, मंदिर व्यवस्थापक, मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य, भक्त तसेच सुमारे २००० बारामतीकर नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

फुलांनी सजलेला रथ, त्यावर विराजमान श्रीजगन्नाथ, बलदेव व सुभद्राजी, अखंड हरिनाम संकीर्तन, टाळ-मृदंगाचा निनाद, पारंपरिक नृत्य, आकर्षक सजावट, पर्यावरणपूरक उपक्रम, आध्यात्मिक पुस्तकांचे वितरण आणि प्रसाद सेवा यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले. रथयात्रा गदिमा सभागृह – पेन्सिल चौक – सिटी इन चौक – सहयोग सोसायटी – महानगर बँक मार्गे त्रिमूर्ती नगर येथील इस्कॉन मंदिरात विसावली.

रथ ओढणे म्हणजे दोरी ओढणे नव्हे, तर भक्तीची नाळ भगवंताशी जोडणे होय, रथ यात्रा म्हणजे श्री कृष्ण यांच्या प्रसन्नेकरिता त्यांना मंदिराबाहेर घेऊन जाणे जेणे करून ते असंख्य लोकांना आपल्या कृपादृष्टीने कृतार्थ करू शकतील. रथयात्रा आपल्या आनंदासाठी नसून भगवान श्रीजगन्नाथांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी साजरी केली जात असल्याचे श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी सांगितले.


