फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३१ ऑगस्ट २०२६):-
फलटण तालुका प्लास्टिकमुक्त करण्याच्या अभियानाची सुरुवात साखरवाडी येथील सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या किमान कौशल्य विभागात उत्स्फूर्त वातावरणात झाली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे.

अभियानाचा एक भाग म्हणून माजी प्राचार्य सुधीर इंगळे यांनी ३१ ऑगस्ट रोजी साखरवाडी येथील प्रशालेस भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य गोपाळराव जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मराठी विभागप्रमुख रवींद्र टिळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

आपल्या विनोदी व प्रभावी शैलीतील भाषणातून सुधीर इंगळे यांनी प्लास्टिकचा अनावश्यक वापर, पर्यावरणावरील गंभीर परिणाम आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी घर, शाळा व परिसरात आढळणारे अनावश्यक प्लास्टिक संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘प्लास्टिकमुक्त फलटण’ ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी केले, तर रघुनाथ शेळके यांनी आभार मानले. साखरवाडी येथून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अभियानाला शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीची दिशा मिळाली आहे.


