फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 10 सप्टेंबर २०२६):- रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रलंबित घरकुलांची कामे अत्यंत गतीने पूर्ण करून उर्वरित घरे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रमाई आवास योजनेचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. या आढावा बैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी संबंधित विभागाने वेगाने पावले उचलावती. आतापर्यंत २१४ लाभार्थ्यांना १०० टक्के हप्ता वितरित करण्यात आला आहे तर १९२ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.
उर्वरित घरकुलांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कामाचा वेग वाढवण्याच्या निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत रमाई आवास योजनेतील उर्वरित सर्व घरकुलांचे काम पूर्णत्वास नेऊन ती लाभार्थ्यांच्या स्वाधीन करावीत. मंजूर घरकुलांचे बांधकाम सुरू झाले नसल्यास त्या विषयीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच सन 2011-2012 पासून प्रलंबीत असणाऱ्या प्रकरणांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी उपलब्ध निधी व सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4 कोटी 21 लाख रुपये खर्च झाला असल्याचे समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी बैठकीत सांगितले.
तसेच नागरी वस्ती सुधार योजनेच्या कामांनाही गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी यावेळी दिल्या.


