कॉपीमुक्त अभियान पारदर्शकतेसाठी तर ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ गुणवत्तेसाठी फायदेशीर

फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर, दि ०८ मे २०२६):- यंदाच्या दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागीय मंडळ निकालात राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे, मागील १० वर्षे कोल्हापूर विभागाचा सन २०२१ चा अपवाद वगळता सतत द्वितीय क्रमांक आहे. निकालात मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात २.०१% तर कोल्हापूर मंडळात १.४०% टक्केची घट झाली आहे. जिल्हानिहाय विचार करता सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल राज्याच्या टक्केवारी पेक्षा जास्त आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल राज्याच्या तुलनेत 3.46% ने जास्त आहे. यावर्षीच्या परीक्षेत प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्हीचा केलेला वापर, सांगली जिल्ह्यात प्रत्येक वर्ग खोलीत पर्यवेक्षकांच्या मोबाईलवरून झूम ॲपच्या मदतीने जिल्हा दक्षता समितीने केलेले परीक्षेचे नियंत्रण यामुळे निकालातील पारदर्शकता वाढली आहे. तसेच यामुळे निकालात घट झाली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळात दहावीच्या फक्त दहा केंद्रांवर प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही नव्हते, मात्र तेथील केंद्रसंचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात आले. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे विभागीय मंडळात राबवण्यात आले. मागील वर्षापासून कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात निकालातील गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. निकालातील फुगवटा कमी होऊन निकालातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने बोर्ड परीक्षेचा राजमार्ग ही अभिनव पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये शाळांनी वर्षभर करायचे प्रशासकीय व शैक्षणिक नियोजन तसेच परीक्षापूरक उपक्रम यांचा समावेश केलेला आहे. गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यासाठी सहकार्य केलेल्या जिल्हा दक्षता समिती तसेच विभागातील सर्व क्षेत्रीय घटकांचे आभार! उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!

-अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ

श्री राजेश क्षीरसागर

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!